सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार आपल्या अभिनयातून आणि कामातून एकच प्रयत्न करत असतो, तो म्हणजे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचण्याचा. सर्वच कलाकार आपला अभिनय आणि अभिनयातून त्यांना महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवत असतात. परंतू मराठी सिनेसृष्टीत ‘आदेश बांदेकर (Aadesh Bandekar)’ असे एकमेव आहेत, जे स्वतः महाराष्ट्राच्या घराघरांत जातात.
‘दार उघड बये’ दार उघड’ असं म्हणत सुरु झालेल्या या कार्यक्रमाचा आणि त्यासोबतच आदेश बांदेकर यांचा एक, दोन वर्ष नव्हे, तर हा प्रवास तब्बल आता २० वर्षांवर येऊन पोहोचला आहे. १३ सप्टेंबर २०२३ रोजी या कार्यक्रमाला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षांमध्ये आदेश यांनी जवळपास १० लाख किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करत या कार्यक्रमाचे ६ हजारहून अधिक भाग पूर्ण केले आहेत. तर या दरम्यान ते तब्बल १२ हजारांहून अधिक घरात गेले आहेत. कोणत्याही कार्यक्रमाचा किंवा कोणत्याही कलाकाराचा असा अविश्वसनीय प्रवास खरंच आश्चर्यजनक आहे.
View this post on Instagram
या कार्यक्रमाकडे खास वळला तो महिलावर्ग. महिलांसाठी बनवण्यात आलेला हा तसा पाहिलाच कार्यक्रम, त्यामुळे आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या तमाम वहिनींचे भाऊजी झाले. १३ सप्टेंबर २००४ साली या कार्यक्रमाचा पहिला भाग शूट झाला होता. तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले की, “एका दिवशी झी मराठीच्या ऑफिसमध्ये नितीन वैद्य केबिनमध्ये बसले होते आणि बाहेर काही महिला बसल्या होत्या. त्यावेळी मी पटकन त्यांना काहीतरी विचारलं आणि त्या सगळ्या जणी हसल्या. मोठ्याने कोण हसलं हे पाहायला नितीन वैद्य बाहेर आले आणि मला म्हणाले हे आता जसं हसण्याचं वातावरण झालं आहे तसं घरात जाऊन लोकांशी करशील का? आणि कार्यक्रम सुरू झाला. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाला महाराष्ट्राने आपलसं केलं आणि माझं चांगलं स्वागत केलं.”
तसेच पहिल्या शूटबद्दल बोलताना ते म्हणाले की, “१३ सप्टेंबर २००४ या दिवशी ‘होम मिनिस्टर’चा पहिला एपिसोड लालबागमध्ये शूट झाला होता. हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. महाराष्ट्राच्या घराघरांतल्या माऊलींचा सन्मान, स्त्रियांचा सन्मान एवढं एकच या कार्यक्रमाचं ब्रीदवाक्य होतं. १३ दिवसांसाठी सुरू झालेल्या या प्रवासाने आता विसाव्या वर्षात पदार्पण केलं आहे. महाराष्ट्राच्या घराघराने आदेशला माझा म्हटलं म्हणून हे विसावं वर्ष माझामध्येच आज साजरं होतंय यासारखा दुसरा आनंद नाही.”
नांदा सौख्य भरे, पंढरीची वारी विशेष, नववधू नं १, जाऊबाई जोरात, स्वप्न गृहलक्ष्मीचे, होणार सून मी ह्या घरची, गोवा विशेष, काहे दिया परदेस, चूक भूल द्यावी घ्यावी, अगंबाई सुनबाई, महाराष्ट्र दौरा, भारत दौरा, करोना काळातील होम मिनिस्टर घरच्याघरी, करोना योद्धा विशेष, सासूबाई माझ्या लईभारी, महामिनिस्टर अशी अनेक पर्वं आणि हजारो साड्या घेऊन आदेश भाऊजी लाखो लोकांपर्यंत पोहोचले. आता मात्र आदेश बांदेकर आणि आणि पैठणी हे एक अनोखं समीकरणच बनले आहे. आणि हे समीकरण पुढेही अनेक वर्षे असेच असणार यात मात्र काहीच शंका नाही.