आज २१ व्या शतकात कोणतीही गोष्ट विकत घेण्याआधी, खाण्याआधी आणि पाहण्याआधी त्याचे रेटिंग पाहिले जातात. सुट्टीच्या दिवशी किंवा विकेंडला सिनेमा पाहायचा असेल तर आधी रेटिंग पडताळून सिनेमा ठरवला जातो. तसेच काहीसे मालिकांच्या बाबतीतही आहे. त्यामुळे टीआरपी रेटिंगकडे प्रेक्षकांचे देखील लक्ष असते. आत्ताच्या मराठी मालिकेच्या टीआरपी यादीमधील सर्वात आघाडीवर असलेली मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग.’
टीआरपीच्या यादीमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळतात, परंतू मागील काही आठवड्यांपासून ठरलं तर मग ही मालिका जणू काही पहिल्या क्रमांकावर चिकटून बसली आहे असं म्हणायला हरकत नाही. काही वर्षांपूर्वीची पुढचं पाऊल या मालिकेतून अभिनेत्री ‘जुई गडकरी’ मालिकाविश्वात सर्वांची लाडकी बनली. जुईचा अभिनय आणि सोज्वळपणा यामुळे तिने खूपच कमी कालावधीत रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. आता ठरलं तर मग या मालिकेतून ती पुन्हा एकदा चाहात्यांच्या मनात घर करत आहे.
ठरलं तर मग या मालिकेत जुई मुख्य भूमिकेत असून तिच्यासह लोकप्रिय अभिनेता अमित भानुशाली हा देखील प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत जुई ‘सायली अर्जुन सुभेदार’ आणि अमित ‘अर्जुन सुभेदार’ हे पात्र साकारत आहेत. तसेच त्यांच्या व्यतिरिक्त चैतन्य सरदेशपांडे, ज्योती चांदेकर, प्रियंका तेंडूलकर, मोनिका दबडे यांसारखे अनेक कलाकार या मालिकेची रंजकता वाढवत असतात. छोट्या पडद्यावरील या सर्व कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे आणि पडद्यामागील सर्वांच्या मेहनतीमुळे ही मालिका मागील काही आठवड्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत उच्चांक गाठत आहे. आता टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा एकदा या मालिकेनेच बाजी मारली आहे.
View this post on Instagram
‘ठरलं तर मग’ या मालिकेने पहिला क्रमांकावर स्थान भक्कम करत ६.९ रेटिंग मिळवले आहे. नुकतीच प्रदर्शित झालेली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला ६.८ रेटिंग मिळाले आहे. ६.६ रेटिंगसह ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला ६.५ रेटिंग, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेला ६.० रेटिंग, ‘आई कुठे काय करते’ला ५.८ रेटिंग, ‘कुन्या राजाची गं तू राणी’ला ५.१ रेटिंग, ‘आता होऊ दे धिंगाणा’ या शोला ४.४ रेटिंग मिळाले असून या सर्व मालिका टीआरपीच्या यादीत टाॅप १० मालिका आहेत.
पहिल्या क्रमांकावरील ठरलं तर मग या मालिकेला नुकतेच १ वर्ष पूर्ण झाले आहे. तरी देखील ही मालिका रोज नव्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे सर्वत्र या मालिकेचे आणि कलाकारांचे कौतुक पाहायला मिळत आहे.