बॉलिवूडमध्ये काम मिळणं ही काही साधी सोप्पी गोष्ट नाही. त्यात बाहेरून आलेल्या एखाद्या कलाकाराला इथे काम मिळवण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. इथे काम मिळणं ही खूपच मोठी गोष्ट असते. आपल्या शरीरावर, आपल्या लुक्सवर प्रचंड मेहनत घ्यावी लागते, अनेक अॉडिशन्स द्याव्या लागतात, अनेक नकार सहन करावे लागतात. यामुळे अनेक नवोदित कलाकार डिप्रेशनमध्ये जातात, काहीजण तर इंडस्ट्री सोडून निघून देखील जातात.
पण असे देखील कलाकार आहेत ज्यांनी बाहेरून येऊन बॉलिवूडमध्ये स्वतःच असं वेगळ स्थान निर्माण केलं आहे. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे विद्या बालन (Vidya Balan). तसं बघायला गेलं तर विद्याचा या इंडस्ट्रीमध्ये कोणीच गॉडफादर नव्हता. तिने स्वतः च्या जिद्दीवर आणि मेहनतीवर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान भक्कम केलं आहे. तिच्या उत्तम अभिनयामुळे तिचे लाखो करोडो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर देखील सक्रीय असते. विद्या तिच्या ‘दो और दो प्यार’ या आगामी सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. या सिनेमात ती अभिनेता प्रतिक गांधी याच्यासोब मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबतच अभिनेत्री ईलियाना डिक्रुझ आणि अभिनेता सेनडील राममूर्ती देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान विद्या अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. अशाच एका मुलाखती दरम्यान विद्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील अनेक प्रश्न विचारले गेले. तेव्हा ती नेपोटिज्मवर देखील बोलताना दिसली. त्यावेळी ती म्हणाली, “मी माझं काम उत्तम करत असून या कामातून मला समाधान मिळत आहे. मुळात इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही. कोणीही कधीही इंडस्ट्रीत येऊन काम करू शकतो. मी आनंदी असून नेपोटिज्मकडे लक्ष देत नाही.”
तिचे अनेक सिनेमे फ्लॉप गेले आहेत. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “माझे सतत चित्रपट फ्लॉप होत होते. तेव्हा लोकांनी मला ट्रोल करायला सुरुवात केली होती. एका दिग्दर्शकाने थेट चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला रिप्लेस केलं होतं. अभिनय, नृत्य येत नसल्याचे सांगत मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पण त्यावेळी माझं कुटुंब माझ्यासोबत होतं. त्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा होता. पुढे ‘मुन्नाभाई’ या चित्रपटाच्या माध्यमातून मी स्वत:ला सिद्ध केलं.”