मराठी सिनेसृष्टीत सध्या वेगवेगळ्या धाटणीचे आणि वेगवेगळ्या विषयांवर सिनेमा बनवले जात आहेत. आपण अनेकदा काही गोष्टींचा विचारही नाही करत इतक्या छोट्या गोष्टींवर आधारित देखील सिनेमा बनवला जातो. तर आता राजकारणावर आधारित असलेला ‘खुर्ची’ हा सिनेमा सध्या चांगलाच गाजत आहे. या सिनेमामुळे चर्चेत आलेला अभिनेता म्हणजे अक्षय वाघमारे (Akshay Waghmare).
अनेक मालिका, सिनेमे तसेच बिग बॉस मराठी या शोमधून अक्षय घराघरांत पोहोचला. आपल्या सर्वांचा लाडका अक्षय आता पुन्हा एकदा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अक्षयने अनेक मुलाखती दिल्या. यावेळी त्याने त्याच्या अनेक गोष्टींचा खुलासा देखील केला आहे. त्यात त्याचं बालपण, शिक्षण, करिअर आणि त्याच्या लग्नाची गोष्ट असा एकूण त्याच्या आयुष्यातील प्रवासापैकी काही गोष्टींवर त्याने भाष्य केले.
सिनेसृष्टीत जेव्हा त्याने कामाला सुरुवात केली तेव्हा त्याला त्याच्या कुटुंबियांचा पाठींबा नक्की कसा होता, याबद्दल त्याने सांगितले. तेव्हा अक्षय म्हणाला की, “सुरुवातीला त्यांचा पाठिंबा नव्हता. पुन्हा तेच की, मी मध्यमवर्गीय घरातून आलोय. आई-वडील दोघेही पुणे युनिवर्सिटीमध्ये काम करायचे ते नेहमी म्हणायचे की इतका चांगला शिकला आहेस तर अरे नोकरी कर. दर महिन्याला पगार मिळेल, नीट राहा, कुटुंब बनव. पण माझा मानस होता की, आयुष्यात काही तरी वेगळं करायचं आहे.” तसेच तो पुढे म्हणाला की, “माझ्या मित्रांना बोलावून मला समजावण्याचा प्रयत्न देखील केला पण मी मागे हटलो नाही. शेवटी जसं जसं यश मिळालं तसं सर्व पाठीशी उभे राहायला लागले.”
यावेळी त्याने त्याच्या पहिल्या नोकरीबद्दल सांगितले. तेव्हा तो म्हणाला की, “२०१२-१३ साली तेव्हा बाहेर कुठे राहायला पैसे नव्हते, तेव्हा तेवढी समज नव्हती तरी, स्वतःचा खर्च मी स्वतःच करायचो. मी एका कंपनीमध्ये कामाला होतो. तिथे होतो तेव्हा मी एक सेल्समन होतो, घरोघरी जाऊन कोण कोणता साबण, कोणतं तेल वापरतं. अशी भलीमोठी यादी होती, त्या कामासाठी मला दिवसाला १ रुपया मिळायचा. नंतर ते वाढत जात जवळपास महिन्याला १७० रुपये मिळू लागले.”
अशाप्रकारे अक्षयने सुरुवातीला नोकरी केली त्यानंतर अभिनयाच्या जोरावर त्याने लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवले. एवढेच नाही तर अभिनयाच्या एक पाऊल पुढे जाऊन तो आता निर्मिती क्षेत्रात देखील उतरला आहे.