अभिनय असो, लेखन असो अथवा कविता एवढंच नाही तर अगदी या सर्वांसोबत दिग्दर्शनाची धुरा सांभाळणारा बहुआयामी कलाकार म्हणजेच संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade). संकर्षणचे अनेक चाहते आहेत. काही त्याच्या अभिनयाचे, काही त्याच्या कवितेचे तर काही त्याच्या लिखाणाचे. त्यामुळे कलाविश्वात त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.
स्वतःमधील निरनिराळ्या कलागुणांच्या जोरावर संकर्षणने कलाविश्वात आणि चाहत्यांच्या मनामनात स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका चांगलीच गाजली. तर आता सध्या संकर्षण ‘तू म्हणशील तसं’ या नाटकातून रंगभूमीवर काम करत आहे. तसेच या व्यतिरिक्त अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये झळकत आहे.
कामासोबतच तो सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रीय असतो. आणि कायम आपल्या चाहत्यांसोबत जोडलेला असतो. तसेच अनेकदा तो वेवेगळ्या विषयांवर मुलाखती देताना देखील दिसतो. नुकतीच संकर्षणने एक मुलाखत दिली, त्यात त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक अनुभव सांगितले आहेत. यावेळी त्याने अभिनय क्षेत्रातील आजवरचा प्रवास, तो स्वतः करत असलेलं लिखाण, तसेच वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना त्याने त्याच्या बालपणातील काही आठवणींना उजाळा दिला तर, काही काही आठवणी सांगताना त्यालाही हसू आवरले नाही.
या मुलाखाती दरम्यान संकर्षणने अनेक नवनवीन खुलासे केले. जसा आज आपल्याला संकर्षण थोडा खट्याळ आणि मिश्कील स्वभावाचा दिसतो, तसाच तो त्याच्या लहानपणापासूनच खोडकर होता. एवढेच नाही तर त्याने एकदा पैसेही चोरी केले होते. अन् त्याची चोरी पकडली देखील गेली. तेव्हा नक्की काय घडलेलं हे सांगताना तो म्हणाला की, “माझे वडील बँकेत होते अन् त्यांच्यासमोर ज्या व्यक्तीचे अकाऊंट असायचे त्याची पूर्ण कुंडली समोर दिसायची. मला एक दिवस माझ्या आजोबांनी एटीएममधून ५०० रुपये काढून आणायला सांगितले. मी एटीएममध्ये गेलो अन् पहिले ३०० रुपये काढले अन् त्याची पावती फाडून फेकून दिली, नंतर ५०० रुपये काढले अन् त्याची पावती जपून ठेवली अन् घरी येऊन आजोबांना ५०० रुपये आणि त्याची पावती अशा दोन्ही गोष्टी दिल्या. आजोबा तेव्हा त्यावर विश्वास ठेवायचे.”
पुढे संकर्षण म्हणाला की, “बाबा जेव्हा बँकेतून घरी आले तेव्हा त्यांनी आजोबांना विचारलं की त्यांनी ८०० रुपये कशासाठी काढले? तेव्हा त्यांचा प्रश्न ऐकताच मला ३०० रुपयांचा घाम फुटला, मला काहीच सुचेनासं झालं. आजोबांनाही पटकन ध्यानात येईना, त्यामुळे त्यांनीदेखील बाबांच्या होकारात होकार मिळवला अन् ८०० रुपये त्यांना लागणार होते हे सांगितलं. बाबा जेव्हा आत गेले तेव्हा आजोबांनी एक शिवी हासडत मला बोलावलं अन् म्हणाले, आपण चोरी करताना आपला बाप बँकेत आहे याचं तरी भान ठेवा!”
संकर्षणच्या बालपणातील हा किस्सा ऐकून सर्वांनाच हसू आवरेना.