मराठी सिनेसृष्टीत नुकतेच अनेकजण लग्नबंधनात अडकले आहेत. त्यापैकी सध्याही सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेत्री ‘गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) आणि स्वानंद तेंडुलकर (Swanand Tendulkar).’ लग्नाच्या केवळ २ दिवस आधी मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी त्यांच्या लग्नाची गोड बातमी चाहत्यांना दिली.
गौतमी आणि स्वानंद मागील २ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. परंतू लग्नघटिका येईपर्यंत त्यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती. मेहंदीचे फोटो शेअर करून त्यांनी चाहत्यांना सुखद धक्काच दिला. गौतमी आणि स्वानंदने २५ डिसेंबर २०२३ रोजी दोघांनी पुण्यात लग्नगाठ बांधली. धुमधडाक्यात पार पडलेल्या त्यांच्या या विवाह सोहळ्यासाठी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि त्यांचे काही जवळचे मित्र-मैत्रिणी आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या लग्नापासून ते आजही त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
View this post on Instagram
गौतमी आणि स्वानंदच्या लग्नाची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा झाली ती त्यांच्या खास हॅशटॅगची. यांच्या लग्नामुळे ‘स्वॅग’ आणि ‘लफडी’ हे दोन हॅशटॅग प्रचंड चर्चेत आले. अनेकांना या हॅशटॅगमागील रहस्य जाणून घेण्याची इच्छा होती. तर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गौतमी आणि स्वानंद यांनी या हॅशटॅगमागील खरी कहाणी सांगितली तसेच हे हॅशटॅग कोणामुळे मिळाले तेही सांगितले. हॅशटॅगबद्दल सांगताना स्वानंद म्हणाला की, “आमच्या ओळखीमधल्या काही लोकांना आमचं चालू आहेत हे माहीत होतं. याशिवाय माझ्या ऑफिसमध्ये आमची एक लफडी गँग आहे आणि आमच्या या गँगचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. आम्ही दोघंही खूप वर्षांपासून एकत्र असल्याने आमचे काही मित्र ‘अरे यांची लफडी चालू आहेत’ असं म्हणायचे. त्यामुळे या सगळ्यावरून लग्नात आम्ही लफडी हॅशटॅग वापरायचा असं ठरवलं.”
हॅशटॅगबद्दल बोलताना गौतमी म्हणाली की, “स्वानंद बऱ्याचवेळा मला ‘ए तू लफडी करू नकोस हा’ किंवा ‘लफडी मत कर’ असं सांगत असतो. चालता-बोलता नेहमी त्याच्या तोंडात लफडी हा शब्द असतो. शेवटी लग्न करताना तो म्हणाला, आता आपण लफडी हा हॅशटॅग करून टाकूया. स्वानंदच्या ऑफिसच्या लोकांमुळे लफडी हॅशटॅगची सर्वात जास्त चर्चा रंगली आणि शेवटी ‘स्वॅग’पेक्षा जास्त ‘लफडी’ हा हॅशटॅग व्हायरल झाला.”
ही झाली त्यांच्या हॅशटॅगची कहाणी, पण यावेळी त्यांनी त्यांची प्यारवाली फिल्मी लव्हस्टोरी देखील सांगितली. गौतमी आणि स्वानंदच्या नात्याची सुरुवात कशी झाली हे सांगताना गौतमी म्हणाली की, “आमची ओळख इंस्टाग्रामवर झाली. सारंगच्या एका पोस्टमध्ये मी याला पाहिलं होतं. बघताक्षणी मला असं वाटलं की, अरे किती गोड मुलगा आहे आणि मला त्याचं हसणं खूप आवडतं. मला मनापासून, मनमोकळेपणाने हसणारे लोक नेहमीच आवडतात. सारंगची पोस्ट पाहून मी त्याला फॉलो केलं. त्यानंतर याने मला फॉलोबॅक केलं. मधल्या काळात आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नव्हतो. हळुहळू इंस्टाग्रामवर आमचं बोलणं होऊ लागलं, तेव्हाच लॉकडाऊन सुरू होतं. सगळं सुरळीत झाल्यावर आम्ही एकमेकांना भेटायचं ठरवलं.”
पुढे स्वानंद म्हणाला की, “माझं बालपण चारकोपच्या चाळीत गेलंय. त्यामुळे मी रॅप वगैरे ऐकणारा मुलगा आणि ही एकदम क्लासिकल संगीत ऐकणारी मुलगी आहे. तिला डेटवर जाणं ही संकल्पना माहीतच नव्हती. त्यामुळे सुरुवातीला तिने डेटवर जायला नकार दिला होता. मग मी तिला नीट समजावलं. पुढे, आमची पहिली भेट झाली तेव्हा मी दोन-तीन अशा गोष्टी केल्या की, तिला त्या अजिबात आवडल्या नाहीत. तरीही आमचं बोलणं सुरु होतं. पहिल्या डेटनंतर काही आठवड्यांनी मी तिच्यासमोर मनातल्या भावना व्यक्त केल्या. तेव्हा तिने नाही उत्तर दिलं. मग मी म्हटलं ओके. पुढे, मी काहीच ट्राय नाही केलं. फक्त आपण आता बोलूया नको असं मी सांगितलं. त्यावर गौतमीचं म्हणणं होतं नाही. मला तुझ्याशी बोलायचंय. या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी मी तिला सोलो ट्रिपला जाऊन ये असा पर्याय सुचवला. सात दिवस ती हिमाचल प्रदेशला जाऊन आली आणि ते सात दिवस आम्ही २४ तास फोनवर बोलत होतो. ती परत आल्यावर थोडी रडारडी झाली. नाही राहू शकत वगैरै, वगैरे आणि आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.”
View this post on Instagram
स्वानंदच्या स्वभावाबद्दल बोलताना गौतमी म्हणाली की, “स्वानंदला मी जेव्हा भेटले तेव्हा माझ्या आयुष्यात खूप वेगळा काळ सुरू होता. तेव्हा मी मानसिक तणावात होते. माझ्या आयुष्यात एवढ्या सगळ्या गोष्टी सुरू असताना सुद्धा तो कायम बरोबर होता. त्याने मला खूप चांगली साथ दिली. स्वानंद खूप जास्त प्रेमळ आणि मुळात खूप जास्त प्रेम करणारा आहे.”
गौतमी आणि स्वानंदने सांगितलेली ही प्रेमकहाणी खरंच एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणे भासते.